क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी 3 जानेवारी या रोजी मोठ्या उत्साहाने बालिका दिन म्हणून साजरी केली जाते.या दिवशी अनेक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम,वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात.त्या अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त भाषणाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे.या भाषणाचा वापर करून आपण देखील श्रोत्यांची शाबासकी मिळवू शकता ..
सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो..
अंधारातून
प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचविले,
चूल व मूल
यापलिकडेही जग असते, हे ज्यांनी
दाखविले..
त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती..
स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया,
बालिकांना
जगण्याचा हक्क द्यावया,
सदा
दिली ज्योतिबांची साथ,
केली
अनंत अडचणींवर मात,
ज्यांनी
शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती,
ज्यांनी
घडवली स्त्रियांची प्रगती..
अशा
त्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती...
क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करत असतो. समस्त बालिकांना
सन्मानाने शिक्षण घेता यावे, यासाठी या माऊलीने आपले अख्खे आयुष्य पणाला
लावले, स्वतःच्या
सुखापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाला जास्त महत्त्व दिले, अशा या माऊलीला
सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा..
सावित्रीबाई
फुले यांचे कार्य समजून घेण्याअगोदर आपल्याला सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यावे
लागेल. सावित्रीबाई फुले
शिकल्या, त्यांनी मुलींना शिकवलं, हे आपण वाचतो. वाचायला हे सर्व
सोपं आहे, परंतु ज्या परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले
शिकल्या, ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी मुलींना शिकवलं, त्या परिस्थितीचा
जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने आपल्याला सावित्रीबाई फुले कोण होत्या.. हे आपल्याला कळेल.
मुली
जन्मल्या म्हणजे पाप झाले, अशी समजूत त्या काळी होती. मुली अबला होत्या, कमजोर होत्या, त्या शिक्षण घेऊ
शकत नव्हत्या, समाजात त्यांना मान-सन्मान नव्हता, फक्त चूल आणि मूल
एवढ्या पुरतच त्यांचे जीवन मर्यादित होतं. अशा अंधकाराच्या वातावरणात 3 जानेवारी 1831 रोजी
नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटलांच्या घरी एका वाघिणीचा जन्म झाला.. त्या वाघिणीचे नाव
होते सावित्रीबाई. वयाच्या नवव्या वर्षी क्रांतिसूर्य ज्योतिराव गोविंदराव फुले
यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला आणि हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की ज्यांच्याशी
त्यांचा विवाह झाला तो काही सामान्य मनुष्य नाही तर लाखो करोडो माणसांना जगण्याची
ऊर्जा देणारा क्रांतीसुर्य आहे. फुले घराण्यात त्या क्रांतीसूर्याच्या
क्रांतीज्योतीच्या म्हणजेच सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा श्री गणेशा झाला. ज्योतिरावांनी
त्यांना लिहायला वाचायला शिकविले आणि 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडे
वाड्यामध्ये त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. भारतीय माणसाने
मुलींसाठी काढलेली ती भारतातील पहिली शाळा होती आणि त्या शाळेतील सावित्रीबाई फुले
या पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या.
सावित्रीबाईंनी
मुलींना शिकवायला सुरुवात केली. पण ही गोष्ट काही समाजकंटकांना मात्र रुचली नाही. त्यांनी
सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. सावित्रीबाई शाळेत शिकवायला जात असताना
त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकण्यात आले. अरे.. आपण रस्त्याने
चालत असताना जर कोणी आपल्या अंगावर थोडेसे पाणी जरी उडवले, तरी आपण त्याला
रागावतो, चिडचिड करतो, कल्पना करा... सावित्रीबाईंची
अवस्था कशी होत असेल ? त्यांना राग येत नसेल का ? हो.. नक्कीच येत असेल. परंतु त्यांनी
स्वतःच्या सन्मानापेक्षा स्त्री शिक्षणाला जास्त महत्त्व दिले. त्यांनी त्या
लोकांना शांतपणे प्रत्युत्तर दिले. त्या म्हणायच्या, “मी माझ्या माता
भगिनींना शिकवण्याचं पवित्र कार्य करत असताना तुम्ही माझ्या अंगावर फेकलेले शेण, चिखल मला फुलचं वाटतात.”
सावित्रीबाई
फुले यांनी लोकांचे बोलणे शांतपणे सहन केले पण प्रसंगी त्यांना जशास तसे उत्तर
देखील दिले, लोकांना त्यांची जागा देखील दाखवून दिली.
सावित्री जुन्या जगाची,
तूचं प्रेरणा नव्या युगाची,
झेलुनी चिखल-शेणामातीचे अन्यायी
अत्याचारी सडे,
दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे,
निर्मळ गंगा तु अक्षराची,
तूचं प्रेरणा नव्या युगाची..
तूचं प्रेरणा नव्या युगाची..
हळूहळू
लोकांना शिक्षणाचे महत्त्व कळू लागलं, सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या कार्याचं रूपांतर
हळूहळू मोठ्या चळवळीमध्ये झालं. त्यांच्या कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने
त्यांना सर्वोत्कृष्ट आदर्श शिक्षिका म्हणून गौरविले.
सावित्रीबाईंनी
फक्त स्त्री शिक्षणासाठीच कार्य केले असे नाही तर त्यांनी इतर अनेक सामाजिक
समस्यां विरोधात आवाज उठविला. विधवा स्त्रियांना सन्मानाने जगता यावे, त्यांना
पुनर्विवाह करता यावा, यासाठी त्यांनी आवाज उठविला. विधवांचे केशवपन होऊ
नये म्हणून त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. सती प्रथेला
त्यांनी विरोध केला. फुले दांपत्याने बालविवाह प्रतिबंधक गृहाची
स्थापना केली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाई फुले
यांचा सिंहाचा वाटा होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी
त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा कायम ठेवला. स्वतःच्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या
साहित्यातून केला. काव्य फुले, बावनकशी सुबोध
रत्नाकर इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
इ.स.1896-97 सालांदरम्यान पुणे
परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला.
हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना
वेगळे करून स्थलांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी
प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला.
त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. दुर्दैवाने प्लेगच्या
रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला आणि त्यातूनचं 10 मार्च इ.स. 1897
रोजी त्यांचे निधन झाले. किती ही निस्वार्थी सेवाभावना.. त्यांना कल्पना
होती की प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांना देखील प्लेग होऊ शकतो, तरी सुद्धा त्या मागे
हटल्या नाहीत..समाज सेवेचे व्रत त्यांनी आपल्या शेवटच्या
क्षणापर्यंत चालू ठेवले..खरंच धन्य आहे ती माऊली.
शेवटी जाता जाता एवढेच सांगेन की..
स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात
पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती
म्हणून तर आज जगती
अमर आहे सावित्री..
अमर आहे सावित्री..